सारांश
पारिभाषिक शब्द
1 . वज्जींच्या अभ्युन्नतीचे सात नियम
भगवान राजगृह येथे गृध्रकूट पर्वतावर राहत होता. त्या वेळी अजातशत्रु राजा वज्जींवर स्वारी करण्याच्या विचारात होता. त्या बाबतीत बुद्ध भगवंताचे मत काय हे जाणण्यासाठी त्याने आपल्या वस्सकार नावाच्या ब्राह्मण अमात्याला भगवंताजवळ पाठविले. त्या अमात्याने अजातशत्रूचा बेत भगवंताला निवेदन केला. तेव्हा आनंद भगवंताला वारा घालीत होता. त्याजकडे वळून भगवान म्हणाला, “आनंदा, वज्जी वारंवार सभा भरवतात आणि एकत्र होतात, असे तू ऐकले आहेस काय?”
आ.- होय भदन्त, वज्जी वारंवार सभा भरवतात आणि एकत्र होतात, असे मी ऐकले आहे.
भ.- वज्जी समग्र एकत्र होतात, समग्र उठतात आणि समग्रपणे आपली कामे करतात काय?
आ.- होय भदन्त, असे मी ऐकले आहे.
भ.- वज्जी आपण न केलेला कायदा केला आहे असे म्हणत नाहीत ना? किंवा केलेल्या कायद्याचा भंग करीत नाहीत ना? वज्जींच्या कायद्याला अनुसरून ते वागत आहेत काय?
आ.- होय भदन्त, वज्जी कायदेशीरपणे वागतात, असे माझ्या ऐकण्यात आले आहे.
भ.- वृद्ध राजकारणी पुरुषांना वज्जी मान देतात काय? आणि त्यांचा सल्ला स्वीकारतात काय?
आ.- होय भदन्त, वज्जी वृद्ध राजकारणी पुरुषांचा मान ठेवतात व त्यांचे सांगणे ऐकतात.
भ.- ते आपल्या राज्यातील विवाहित किंवा अविवाहित स्त्रियांवर बळजबरी करीत नाहीत ना?
आ.- भदन्त, वज्जींच्या राज्यात स्त्रियांवर जबरदस्ती होत नाही, असे मी ऐकले आहे.
भ.- वज्जींच्या नगरीतील आणि नगराबाहेरील देवस्थानांची ते योग्य जोपासना करतात ना?
आ.- ते आपल्या देवस्थानांची योग्य काळजी घेतात, असे मी ऐकले आहे.
भ.- आपल्या राज्यात आलेले अर्हन्त सुखाने राहावे व न आलेल्या अर्हन्तांना राज्यात येण्यास उत्तेजन मिळावे, यास्तव अर्हन्तांना कोणत्याही प्रकारे ताप पोचू नये याबद्दल वज्जी व्यवस्था ठेवतात ना?
आ.- होय भदन्त, अर्हन्तांना ताप पोचू नये याबद्दल वज्जी दक्षता बाळगतात, असे मी ऐकले आहे.
तेव्हा भगवान वस्सकार अमात्याला म्हणाला, “हे ब्राह्मणा, एके वेळी मी वैशालीमध्ये राहत असता अभ्युन्नतीचे हे सात नियम वज्जींना उपदेशिले. जोपर्यंत या नियमांना अनुसरून वज्जी वागतील, तोपर्यंत त्यांची उन्नतीच होईल, अवनति होणार नाही.”
वस्सकार म्हणाला, “भो गोतम, यांपैकी एका नियमाला जरी वज्जी अनुसरले तरी त्यांची उन्नति होईल, अवनति होणार नाही. तर मग त्यांनी सातही नियम पाळले, तर त्यांची उन्नति होईल हे सांगावयालाच नको.”
2 . सात नियमांवरील टीका
ह्या सात नियमांवरील बुद्धघोषाचार्यकृत अट्ठकथेचा गोषवारा-
१. वारंवार एकत्रित होतात. काल जमलो होतो, परवाही जमलो होतो, तेव्हा आज आणखी कशाला जमा, असे न म्हणता एकत्र जमतात. अशा रीतीने एकत्र न झाले तर चोहोंकडून आलेल्या बातम्या समजून घेता येत नाहीत. अमुक गावाच्या किंवा शहराच्या सीमेबद्दल विवाद उपस्थित झाले आहेत, किंवा चोर बंड करीत आहेत, इत्यादिक वर्तमान ध्यानात येत नाही. राज्यकर्ते बेसावध आहेत असे जाणून चोर देखील लूटफाट करतात. याप्रमाणे राज्यकर्त्यांची अवनति होते. वारंवार एकत्र जमल्याने सगळ्या बातम्या ताबडतोब समजतात, आणि फौज पाठवून बंदोबस्त ठेवता येतो. राज्यकर्ते सावध आहेत असे जाणून चोर देखील टोळ्या करून राहत नाहीत; टोळ्या मोडून पळ काढतात. याप्रमाणे राज्यकर्त्यांची उन्नति होते.
२. समग्र एकत्र होतात इत्यादि. आज काही काम आहे, किंवा मंगलकार्य आहे असे म्हणून चुकारपणा न करता एकत्र होण्यासाठी नगा-याचा शब्द कानी पडताच एकत्र होतात. एकत्र झाल्यावर विचारपूर्वक सर्व कामांचा निकाल लावल्यावाचून जाऊ लागले, तर त्यांना ‘समग्र उठतात’ असे म्हणता येत नाही. तसे न करता सर्व कृत्ये आटपून एकत्र उठतात, समग्रपणे आपली कामे करतात, म्हणजे जर एखाद्या राजाला काही काम पडले, तर इतर सर्व राजे त्याच्या मदतीला जातात. किंवा दुस-या राज्यातील कोणी पाहुणा आला तर त्याच्था आदरसत्काराला सगळेच हजर असतात.
3. न केलेला कायदा इत्यादिक. म्हणजे न ठरलेली जकात, कर वगैरे घेत नाहीत, पूर्वी ठरल्याप्रमाणेच घेतात. केलेल्या कायद्याचा भंग करीत नाहीत, कायद्याला अनुसरून वागतात. म्हणजे चोर म्हणून कोणाला धरून आणले तर त्याला चौकशी केल्यावाचून शिक्षा देत नाहीत. अशा रीतीने राज्यकर्ते वागले नाहीत, तर लोक उपद्रुत होतात; आणि सरहद्दीवर जाऊन स्वत: बंडखोर होतात किंवा बंडखोरांच्या टोळ्यात सामील होतात अणि राज्यावर हल्ला करतात. ह्याप्रमाणे राज्यकर्त्यांची अवनति होते. कायदेशीरपणे वागल्याने वेळेवर कर वसूल होतो, तिजोरी वाढते आणि त्यायोगे सैन्याचा व खासगी खर्च व्यवस्थित चालतो.
वज्जींचा कायदा म्हणजे, जर चोर म्हणून कोणाला पकडून आणले तर वज्जी राजे त्याला एकदम शिक्षा न देता विनिश्चय महामात्यांच्या स्वाधीन करीत. ते अधिकारी तो चोर आहे किंवा नाही याची नीट चौकशी करून चोर नसला तर सोडून देत, आणि चोर असला तर आपण काही एक मत न देता व्यावहारिकांच्या स्वाधीन करीत. ते देखील तशीच चौकशी करून चोर नसला तर त्याला सोडून देत, अणि चोर असला तर अंत:कारिक नावाच्या अधिका-यांच्या हवाली करीत. ते देखील चौकशी करून चोर नसला तर अष्टकुलादिकांच्या स्वाधीन करीत, ते पूर्वीप्रमाणेच चौकशी करून चोर ठरला तर सेनापतीच्या, सेनापति उपराजाच्या, आणि उपराजा राजाच्या स्वाधीन करी. राजा चोर नसला तर त्याला सोडून देई, पण चोर ठरला तर प्रवेणीपुस्तक (कायद्याचे पुस्तक) वाचावयाला लावी. त्या पुस्तकात अमुक कृत्याला अमुक दण्ड असे लिहून ठेवलेले असे. त्याला अनुसरून त्या चोराला राजा दण्ड करी. असा हा प्राचीन वज्जींचा कायदा.
४. आपल्या वृद्ध राजकारणी पुरुषांचा मान ठेवला नाही, आणि त्यांची वारंवार भेट घेतली नाही, तर त्यांचा सल्ला मिळावयाचा नाही, आणि तेणेकरून राज्यकर्त्यांची अवनति होईल. पण जे वडिलांचा सल्ला घेतात त्यांना अमुक प्रसंगी कसे वागावे हे बरोबर समजते, आणि तेणेकरून त्यांची उन्नति होते.
५. विवाहित किंवा अविवाहित स्त्रियांवर बळजबरी केली, तर राज्यातील लोक असंतुष्ट होतात. आम्ही ज्या मुलींना लहानाचे मोठे केले, त्यांना हे राज्यकर्ते जबरदस्तीने आपल्या घरी नेऊन ठेवतात, असे म्हणून लोक सरहद्दीवर जाऊन स्वत: बंड करतात, किंवा दुस-या बंडखोरांना सामील होतात, आणि राज्यावर स्वा-या करतात. बायकांवर बळजबरी झाली नाही, राज्यकर्त्यांकडून त्यांना रक्षण मिळाले, म्हणजे लोक निश्चितपणे आपली कामे करतात, आणि त्यामुळे राज्याच्या संपत्तीची अभिवृद्धि होते.
६. देवस्थानांची योग्य जोपासना केली म्हणजे देवता राज्याचे रक्षण करतात.
७. अर्हन्तांना कोणत्याही प्रकारचा ताप पोचू देत नाहीत, म्हणजे त्यांच्या राहण्याच्या जागेच्या आसपास कोणी झाडे न तोडावी, जाळी पसरून मृगांना न पकडावे, तळ्यात मासे मारू नयेत, यासंबंधाने काळजी घेतात.
अट्ठकथेत वज्जींच्या कायद्यावर थोडीशी विस्तृत टीका आहे. चोराला पकडला तर त्याची चौकशी क्रमश: विनिश्चय महामात्य, व्यावहारिक, अंत:कारिक, अष्टकुलिक, सेनापति, उपराजा आणि राजा असे सात प्रकारचे अधिकारी करीत असत. यात अष्टकुलिक म्हणजे आजकालच्या ज्यूरीसारखे होते की काय हे सांगता येत नाही. इतर अधिक-यांची अधिकारमर्यादा काय होती, हे देखील समजत नाही. राजा म्हणजे गणराजांचा अध्यक्ष. तो किती वर्षेपर्यंत अध्यक्ष असे, याची माहिती कोठेच सापडत नाही. वज्जींच्या कायद्याचे पुस्तक लिहिलेले होते, ते साफ नष्ट झाले, ही मोठ्या दुःखाची गोष्ट होय. ग्रीक लोकांप्रमाणे जर आमच्या पूर्वजांना राज्यव्यवस्थेचे प्रेम असते, तर ह्या गणराजांचा इतिहास लुप्तप्राय झाला नसता.
बायकांवर बळजबरी होऊ न देण्याविषयी वज्जी सावधगिरी बाळगीत, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. गणराजे जेव्हा अव्यवस्थितपणे वागू लागले, तेव्हा गरीब लोकांच्या बायकांवर जुलूम होऊ लागला, असे अनुमान करण्यास हरकत नाही. त्यामुळे लोकांना एकसत्ताक राज्यपद्धति बरी वाटू लागली. महाराजा फार झाले तर आपल्या शहरातील काही बायकांना झनानखान्यात नेऊन ठेवी; पण हे गणराजे सगळ्या देशभर पसरले असल्यामुळे कोणत्याही गावातील बाई यांच्या जुलमापासून मुक्त राहणे शक्य नव्हते. यास्तव लोकांनी राजीखुषीने एकसत्ताक राज्यपद्धति स्वीकारली असावी.
एकदा हे राजे अव्यवस्थितपणे वागू लागले, म्हणजे त्यांच्यात फाटाफूट होणे साहजिक होते. वज्जी गणराजांत वस्सकार ब्राह्मणाने फूट पाडली, आणि त्यामुळे अजातशत्रूला त्यांचा पराजय करणे अगदी सोपे झाले. वज्जींच्या गणराज्याचा लय झाल्यावर लवकरच मल्लांचे गणराज्य देखील लयाला गेले असावे. अशा रीतीने प्राचीन गणसत्ताक राज्यांचा नाश झाला. त्यांच्या संघटनेची आणि कायद्यांची तुरळक माहिती बौद्ध वाड्ःमयात शिल्लक राहिली, एवढेच काय ते.
बौद्ध संघाने एकत्र जमून संघकृत्ये करण्याची जी पद्धति विनयपिटकात दिली आहे, तिच्यावरून वज्जी इत्यादिक गणराजे एकत्र कसे जमत व आपल्या सभेचे काम कसे चालवीत यांचे अनुमान करता येते.

